आजरा (हसन तकीलदार ) : येथील जनता एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श व रवळनाथ बालक मंदिर शाळा नूतन इमारतींचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी होते.
स्वागत व प्रास्ताविक आदर्श बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका साधना नारे यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवारांचा सत्कार करण्यात आला. शाळा इमारत बांधकाम इंजिनिअर अभिजित जानकर यांचा सत्कार विलास नाईक यांचे हस्ते करण्यात आला. तर जनता एज्युकेशन सोसायटीला राज्य स्तरावरील आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून पारितोषिक मिळाल्याबद्दल नाम. आबिटकर यांच्या हस्ते अशोकआण्णा चराटी यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शैक्षणिक संस्थामध्ये आज स्पर्धा तयार झालेली आहे. विद्यार्थी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. आपल्या पाल्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते त्यासाठी पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. गुणवंत आणि आदर्श विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे आणि हे गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकही त्या दर्जाचे असायला हवेत.
अध्यक्षीय भाषणात अशोकआण्णा चराटी म्हणाले, आज जनता एज्युकेशन सोसायटी शिक्षणाचे वटवृक्ष बनले आहे. बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण या संस्थेत उपलब्ध आहे. येथील विद्यार्थी अनेविध क्षेत्रात आपले नावलौकिक करीत आहे. देश विदेशात विविध क्षेत्रात काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रातीलशिक्षण देण्याचा मानस संस्थेचा आहे.
संचालक के. व्ही. येसणे म्हणाले, 1965 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून कै. काशिनाआण्णा चराटी, कै. माधवराव देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था स्थापन केली. 40 पटावरून ही शाळा एका खोलीत सुरु झाली. आजही येथे अखंड ज्ञानगंगा वाहते आहे. 2008 नंतर अशोकअण्णांच्या धाडसी वृत्तीने या संस्थेला उज्वल परंपरा लाभली आहे. सर्व सुविधानीयुक्त हे महाविद्यालय शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक कमवत आहे.
यावेळी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी शरद मगर, उपाध्यक्ष विलास नाईक, संचालक डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, जोत्स्ना चराटी, दशरथ अमृते, जी. एम. पाटील, अनिरुद्ध केसरकर, संजय चव्हाण, संतोष भाटले, शरीफ खेडेकर, असिफ पटेल, जयवंत सुतार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आण्णाप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलांबरी कांबळे यांनी आभार मानले.