भाजप शिष्टमंडळाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात पाणीपुरवठा, स्वच्छता, कचऱ्याची उचल, गटारीच्या बाजूने वाढलेले गवत आदी नागरी सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. या समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरात अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे. ठिकठिकाणी कचरा व सांडपाणी साचलेले आहे. त्याचा निचरा वेळीच केला जात नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठाही अवेळी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाण्याचे मीटर हवेमुळे अधिक फिरत आहे. त्याचा भुर्दंडही नागरिकांना बसत आहे. त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
घंटागाड्या धावती भेट दिल्यासारखे करताहेत. घरातून कचरा आणेपर्यंत घंटागाडी थांबत नाही. कचरा घरासमोर ठेवल्यानंतर कुत्र्यांचा त्रास सुरू आहे. त्यामुळे घंटागाडी थांबून कचरा नेण्याची सूचना देण्यात यावी. नळजोडणीसाठी खोदलेले खड्डे तसेच आहेत. विशेषतः गटारी व रस्त्याच्या बाजूने तण वाढले आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. तण काढून औषध फवारणी करावी. अनेक ठिकाणी डिजिटल बोर्ड अनधिकृतपणे लावले आहेत. त्यावर कार्यवाही करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे; परंतु अजूनही कोणतीच कारवाई केली नाही. गडहिंग्लज शहर डिजिटलमुक्त करण्याची तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची वेळोवेळी स्वच्छता करण्याची गरजही प्रशासनाकडून दुर्लक्षित आहे. परिणामी, दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने तातडीने या समस्यांवर उपाययोजना करावी, अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे, अनिल खोत, संजय कुलकर्णी, मानसिंग जाधव, दीपक जोई, सुधाकर गोरुले, अनिता चौगुले, कुमार पाटील, चंद्रकांत सावंत, निलांबरी भुईंबर, आनंदी चव्हाण, अजित जामदार उपस्थित होते.