आजरा (हसन तकीलदार ) : वन्यप्राण्यामुळे शेतकरी आणि प्रवासी यांना होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे आजऱ्यात टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरु आहे. 30 मे 2025 रोजी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने एकदिवशीय धरणे आंदोलन केले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी कोल्हापूर जिल्हा वनसंरक्षक यांचेशी आजऱ्यात बैठक आयोजित करून समस्या बाबत चर्चा करणेची मागणी केलेनुसार दि. 26 जून 2025रो जी बैठकीचे आयोजन करण्याचे ठरल्यानंतर तात्पुरते हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यानुसार दि. 26 रोजी सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या सोबत वनविभाग कार्यालयात बैठक संपन्न झाली.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांनी सकारात्मक चर्चा करीत आपल्या मागण्यांचे व सुचनाबाबतचे निवेदन देण्यास सांगितले. त्यानुसार बहुजन मुक्ती पार्टीने आपल्या मागण्यांचे व सूचनांचे निवेदन वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांना दिले. त्याचप्रमाणे हे निवेदन वनमंत्र्यांना पाठवण्यात आले.
या निवेदनात प्रामुख्याने वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या शेतकरी, मजूर, प्रवासी नागरिक यांना योग्य नुकसान भरपाईबाबत मागणी करण्यात आली आहे. चुकीच्या कायद्याची दुरुस्तीचीही मागणी करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने एखादा प्रवासी मोटर सायकल अथवा आपल्या वाहनावरून जात असताना एखाद्या वन्यप्राण्याच्या धडकेने अपघात झाला आणि त्या इसमाचे मृत्यू झाले तर नुकसान भरपाई मिळत नाही हे अयोग्य व अन्याय कारक असल्याचे म्हणत अशा कायद्याच्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे यासाठी वनमंत्री आणि वनविभागाकडे कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. दुसरा मुद्दा वन्यप्राणी जंगलातच कसे राहतील यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे यात प्रामुख्याने संपूर्ण जंगल भागाला सौरऊर्जा कुंफण आणि इ. पी. टी.(चर खुदाई )याची मागणी करत जंगलात आंबा, फणस, चिंच, बाभूळ, शिसम, जांभूळ यासारखी रायवाळी झाडे लावून निलगिरी, ऑस्ट्रेलीयन बाभळ सारखी परदेशी झाडे नष्ट करून जंगलात गवतांची कुरणे तयार करणे, पाण्याच्या तळ्यांची निर्मिती करणे आदिबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, अवधूत सुतार, अमित सुळेकर, राहुल मोरे, दशरथ सोनुले, संदीप दाभीलकर, महादेव कांबळे, रवी देसाई, नितीन राऊत, प्रकाश कांबळे, किरण के के आदिजण उपस्थित होते. याबाबत १ जुलैला बहुजन मुक्ती पार्टीने भारत बंदची हाक दिली आहे.