ग्रामविकास मंत्री, पालक मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदन
आजरा (हसन तकीलदार ): अगोदरच आजऱ्याचे तीन तुकडे करून तीन तालुक्याला जोडले गेल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खिळ बसल्याचा आरोप होत असतानाच पुन्हा एकदा जिल्हापरिषद व पंचायत समितीचे गण कमी करून तालुक्यावर अन्याय केला असल्याचा सर्व क्षीय नेत्यातून सूर उमटत आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समितीचे सहा अशी मतदार संघाची रचना होती. परंतु नगरपंचायतीचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे दोन गण कमी केले आहेत. सद्या लोकसंख्येचा विचार केला तर तालुक्यातील वाड्या, वस्ती आणि खेड्यांची संख्या वाढली असल्याने साहजिकच लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे किमान पूर्वी प्रमाणे गण अबाधित राहणे गरजेचे होते.
यासाठी तालुक्याचे नेते अशोकआण्णा चराटी यांनी आमदार शिवाजीराव पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्या सोबत मंत्रालयात जाऊन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देऊन आजरा तालुक्यातील कमी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाबाबत योग्य विचार होऊन जिल्हापरिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा अशी मतदार संघाची पूर्ण रचना व्हावी अशी मागणी केली आहे.
यावेळी आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक, तालुक्याचे नेते अशोकआण्णा चराटी, दशरथ अमृते, जयवंत सुतार, संजय सावंत आदिजण उपस्थित होते.