Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन ; धनगरमोळातील घरांमध्ये शिरले गटारीचे पाणी

संकेश्वर -बांदा महामार्गामुळे रस्त्याशेजारील रहिवाशांचे होत आहेत हाल 




आजरा (हसन तकीलदार ): मागील दोनवर्षांपासून संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम सुरु होते. आता ते पूर्णत्वास गेले आहे. परंतु या महामार्गावरील रस्त्याशेजारील गटारी योग्यरित्या न बांधल्यामुळे काही ठिकाणी त्रास तर होतच आहे परंतु धनगरमोळा परिसरात गटारीच बांधल्या नसल्यामुळे पावसाचे रस्त्यावरील पाणी घरामध्ये घुसण्याचे प्रकार सुरु आहे. पावसाच्या सुरवातीलाच ही परिस्थिती असेल तर संपूर्ण पावसाळा आम्ही झेलायचा कसा असा प्रश्न तेथील रहिवासी करीत आहेत. हा भाग अतिपावसाचा असून याठिकाणी त्वरित गटारी बांधून देण्याची मागणी जोर धरत आहे.

     



मौजे सुळेरान पैकी धनगरमोळा येथील आनंदा शेटगे यांचे घरापासून ते संजय शेटगे यांचे घरापर्यंत पावसाळ्यातील शेतातून येणारे पावसाचे पाणी गटर नसल्याने रस्त्याच्या शेजारी रहात असलेल्या सर्वांच्या घरामध्ये जात आहे. त्यामुळे घरातील प्रापंजिक साहित्याचे नुकसान तर होतच आहे, त्यामुळे घरांची पडझड होऊन जिवीत हानी होण्याचीही शक्यता आहे. येथून ग्रामपंचायतीची पाण्याची पाईप असल्याचे कारण बोलले जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा पाईप खराब किंवा नादुरुस्त झाली तरी काही हरकत नाही पाईपलाईनसाठी येणारा भविष्यातील खर्च ग्रामपंचायत करण्यास तयार आहे. त्याचप्रमाणे पाईप लाईनची पर्यायी व्यवस्था केलेली असल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे वर्षभरापूर्वी कळविले असून धनगरमोळा येथे आनंदा शेटगे ते संजय शेटगे यांचे घरापर्यंत पाहणी करून गटर बांधकाम करण्यास सुळेरान ग्रुप ग्रामपंचायत यांनी दि. 9 मे 2024 रोजी निवेदन देऊन मागणी केली होती. तरीसुद्धा आजपर्यँत यावर उपाययोजना आखणेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डोळेझाक करीत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.