आजरा (हसन तकीलदार ): 26 जून हा दरवर्षी अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघांनी 1987मध्ये या विरोधात ठराव पारित केला होता. अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत डॉ. युनूस सैय्यद यांनी आजरा महाविद्यालयाच्या युवकांशी संवाद साधून तरुणांमधील वाढत्या व्यसनाधिनते बद्दल चिंता व्यक्त केली.
आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित राष्ट्रीय कीटकजन्य रोग व जलजन्यरोग उपाय नियंत्रण तसेच अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संवाद साधत डॉ. सैय्यद यांनी म्हटले कि, सद्यस्थितीत आपल्या देशामध्ये तरुण पिढी गांजा, चरस, तंबाखू अशा अंमली पदार्थांना बळी पडत चालली आहे. गुजरातच्या अहमदाबाद बंदरावर 25हजार कोटीची अंमली पदार्थ पकडले गेले. काही दिवसासाठी बातमी आली आणि ती लुप्त झाली. याचा अर्थच असा होतो कि देशातील युवा पिढीला देशोधडीला लावण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत आहेत कि काय अशी शंका उपस्थित होते.
केवळ कुतूहलापोटी व्यसनांची सुरवात होते आणि पुढे जाऊन ती दीर्घकालीन सवय लागून संपूर्ण कुटुंब उध्वस्त करीत आयुष्याची राखरांगोळी करते. अशा परिस्थितीत तरुण पिढीने तंबाखू, गुटखा, दारू, अंमली पदार्थ सिगारेट अशा व्यसनापासून दूर राहून इतरांनासुद्धा त्यापासून परावृत्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत वातावरणातील होणाऱ्या अचानक बदलामुळे कीटकजन्य व जलजन्य आजारांची साथ पसरत आहे याबाबतही त्यांनी माहिती देऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व योजना बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच एन. एस. एस. प्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी सांगितले.