भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy) NEP 2020 राबवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात 0 ते 20 पटसंख्या असलेल्या दुर्गम भागातील, खेड्यापाड्यातील, वाड्यावस्त्यांवरील मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळा बंद न करता त्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करा अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पुरेशा विद्यार्थी संख्येच्या अभावी 0 ते 20 पटसंख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद करावयाचा शासनाचा विचार असल्याचे समजते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात असा निर्णय राबविल्याने मुले शिक्षणापासून वंचित रहातील. त्यासाठी पटसंख्या वाढवणे करिता मुलांना आणि पालकांना उद्युक्त करणाऱ्या, विनामुल्य बस पास,गणवेश, पाठ्यपुस्तके , शिष्यवृत्ती, इत्यादी विविध योजना आखून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल.
त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण( National Education Policy) NEP 2020 राबवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात 0 ते 20 पटसंख्या असलेल्या दुर्गम भागातील,खेड्यापाड्यातील, वाड्यावस्त्यांवरील प्राथमिक शाळा बंद न करता त्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करा व निर्धारित पटसंख्या पुरी होताच त्या नव्या दमाने आहे त्या ठिकाणीच पुन्हा सुरू करा, अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे.