कौलगे नजीक सुरू असलेले काम शेतकऱ्यांनी पुन्हा बंद पाडले
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नये : राजेंद्र गड्यानावर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी व अधिकारी यांच्यात कौलगे नजीक शाब्दिक चकमक झाली. या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असल्याने बाधित शेतकरी आक्रमक होत काम पुन्हा बंद पाडले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर व महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी या ठिकाणी भेट देत जोपर्यंत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले जात नाही व मोबदला बाबत धोरण ठरत नाही तोपर्यंत काम करण्यात येऊ नये असे संबंधित अधिकाऱ्यांना बजावत काम थांबविण्यास सांगितले.
कौलगे फाट्यावर काल शेतकऱ्यांनी महामार्गाचे काम बंद पाडले होते. दरम्यान, आज पुन्हा या ठिकाणी काम सुरू असल्याचे पाहून शेतकरी आक्रमक झाले. शेतकरी व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. काम चालू झाल्याचे शेतकऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली. सदर ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर, कॉ. शिवाजी गुरव, जयवंत थोरवतकर यांनी तेथील अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेऊन काम न करण्याची विनंती केली. जोपर्यंत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भरपाई बाबत धोरण ठरत नाही तोपर्यंत काम करू नये असे खडसावून सांगितले व मशिनरी तिथून हलवण्यास भाग पाडले.
शेतकरी- अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक 👇
यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना राजेंद्र गड्यानावर म्हणाले, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथील शाहू सभागृहात राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध अधिकारी व महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत महामार्ग संदर्भातील धोरण ठरविले जाणार आहे. या संदर्भात महामार्गात बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित बोलवावे व त्यांना विश्वासात घेऊन काम सुरू करावे असे आपण अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या महामार्गात किती शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच घरे जाणार आहेत याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी मगच हे काम हात घेण्यात यावे. दिनांक 28 रोजीच्या बैठकीत भरपाई संदर्भातील धोरण ठरल्यानंतर महामार्गाचे काम सुरळीतपणे सुरू होण्यास मदत होईल असे श्री.गड्यानावर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, मगच काम सुरू करा: राजेंद्र गड्यानावर👇