अनंत चतुर्दशी दिवशीच घटनेने खळबळ ; घराचे प्रचंड नुकसान
घराचे दरवाजे निखळले ; खिडक्यांच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरापर्यंत पडल्या
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील महागाव येथे शनिवार तुषार गारमेंटचे मालक सुनील खटावकर यांच्या घरात झालेल्या गॅस गळतीमुळे सिलिंडरच्या झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला. या दुर्घटनेत घरात कोणी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. स्फोटात घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घराच्या खिडकीच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरापर्यंत पडल्या होत्या. यामुळे घरात आणि गल्लीत अक्षरशः काचांचा खच पाडला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महागावतील परीट गल्लीत कापड व्यावसायिक सुनील खटावकर यांचे घर आहे. त्यांच्या कुटुंबात दोन लहान मुलासह आठजण राहतात. घटनेच्या अगोदर श्री खटावकर हे दुकानात होते.पत्नी घरीच होती. स्फोट झाल्यानंतर शेजारील मुलाने माहिती दिली. घरी आल्यानंतर पत्नीला विचारले, तेव्हा तिने आम्ही सर्वजण गणपतीच्या आरतीला गेलो होतो.असे सांगितले.त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सदरच्या घटनेबाबत आपली कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे खटावकर यांनी पोलीस पंचनाम्यात सांगितले आहे. दरम्यान, बीट हवलदार आर.वाय. नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास भोसले, मंडल अधिकारी आर.के. तोळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
महागावकर धावले मदतीला
घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रशांत शिंदे,पोलीस पाटील प्रदीप कांबळे,व्यापारी संघटना,गणेश मंडळाचे कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले.सर्वांनी खटावकरांना धीर देत घरातील व रस्त्यावरील सर्व काचा एकत्रित केल्या.
स्फोटाने महागाव परिसर हादरला
शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने मंडळांच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूका सुरू होत्या.फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यातच हा सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरला. फटाक्यांमुळे सुरुवातीला नेमका स्फोट झाल्याचे कोणाच्या लक्षात आले नव्हते, मात्र घराचे सर्व दरवाजे निखळले, खिडक्यांच्या स्लाइडिंगच्या काचा फुटून शंभर मीटर अंतरावर पडल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले.
घरातून आरतीसाठी सर्वजण बाहेर गेले अन...
खटावकर यांच्या घरात गणेशोत्सवात दरवर्षी मंडळातील कार्यकर्त्यांना विसर्जनानंतर जेवण दिले जाते.अर्धे जेवण तयार झाल्यानंतर गणेशाच्या आरतीसाठी सर्वजण गेले होते. त्याचवेळी ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. स्फोटानंतर घरातील दरवाजे निखळले, मात्र दरवाज्यावर असलेल्या गणेश मूर्तींना मात्र काहीही झालेले नव्हते. याची चर्चा नागरिकांमध्ये होती.





