कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त होते. त्या नुसार जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व तहसिलदार कार्यालय करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृह येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सेवा पंधरवड्यात राबवण्याचे टप्पेनिहाय उपक्रमांतर्गत शासन निर्णयातील निर्देशानुसार दिलेले कामकाज प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यामध्ये दैनंदिन करावयाच्या कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी सांगितली. ते म्हणाले ,पंधरवड्यामध्ये पहिल्या पाच दिवसांच्या टप्यात शेत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत, तसेच या रस्त्यांची मोजणी करून सीमांकनानुसार रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी. या रस्त्याबाबत ग्रामसभेमध्ये वाचन करून माहिती देण्यात यावी. दुसऱ्या टप्यातील पाच दिवसांमध्ये सर्वांसाठी घरे अंतर्गत शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून पट्टे वाटप करणे तर तिसऱ्या टप्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्लास्टिकमुक्त कोल्हापूर अभियान, नशामुक्त कोल्हापूरसाठी रॅलीचे आयोजन, आदर्श आपले सरकार सेवा केंद्र व माजी सैनिक यांच्या समस्यांबाबत मेळावा इ. उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले . विविध प्रकारचे दाखले, संजय गांधी योजना मंजूरीपत्र, अन्नसुरक्षा योजना लाभ, लक्ष्मीमुक्ती योजना इत्यादीचे वितरण आज करण्यात आले.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, करवीर तहसिलदार स्वप्निल राबडे, (सा . प्र ) तहसिलदार विजय पवार, चिटणीस हणमंत म्हेत्रे, करवीरचे नायब तहसिलदार यांच्यासह इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होत.


