Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी 'भीक मांगो आंदोलन'

राधानगरी तालुक्यातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तप्रश्नी ठाकरे शिवसेनेचा वन विभागाला इशारा 


तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक 




राधानगरी : राधानगरी तालुक्यातील शेतकरी गेले किती वर्ष वन्य प्राण्यांच्या उपद्रवांमुळे त्रस्त आहेत. शेतीच्या नुकसानी बरोबरच जीवाला देखील त्यांना मुकावे लागत आहे. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताकडे शासन डोळेझाक करीत आहे. खुद्द पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांची होत असलेले फरफट दुर्दैवी आहे, हा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत तहसीलदार अनिता देशमुख यांच्या दालनात शिवसेना पदाधिकारी, शेतकरी व वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने निधी मंजूर न झाल्यास कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या पुढील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी आम्ही 'भीक मागो' आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने यावेळी प्रशासनाला दिला. 



शेतकऱ्यांवरील वन्य प्राण्यांच्या हल्ल्याबाबत ठाकरे शिवसेनेच्या वतीने यापूर्वी निवेदन देत याप्रश्नी संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर  ही बैठक पार पडली. जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यावेळी उपस्थित होते.



यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, शेतकरी जीवाला मुकल्यानंतर पंचवीस लाख रुपये भरपाई देण्यापेक्षा शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्ले होऊ नाहीत म्हणून उपायोजना करणे गरजेचे आहे. वन विभागाने आतापर्यंत कोणत्या उपाययोजना केल्या, भविष्यात काय करणार आहात? असा प्रश्न उपस्थित केला. यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची खंत बोलून दाखवली. इतर कामांसाठी निधी उपलब्ध होतो मग शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारकडून हात आकडता का घेतला जातो? शेतकऱ्यांचे मरण स्वस्त झाले का? असा प्रश्न जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांनी उपस्थित करत नाराज व्यक्त केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात खैर वृक्षांची तोड करून तस्करी केली जाते. वृक्षतोड होईपर्यंत वन विभागाच्या लक्षात कसे येत नाही, मग वन विभागाचे कर्मचारी काय करतात, कुठे जातात हा संशोधनाचा भाग आहे असे सांगत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. या तस्करीकडे दुर्लक्ष करण्या पाठीमागील गौडबंगाल काय? असा प्रश्न देखील प्रा. शिंत्रे यांनी उपस्थित केला.



उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले यांनी येथील इकोसेन्सिटिव्ह झोन परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे. याकडे वन विभागाने डोळेझाक केले आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले, सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होतो मग येथे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी निधी का उपलब्ध होऊ शकत नाही? असा सवाल त्यांनी केला. उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी धामणी प्रकल्प वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकल्पासाठी शासकीय जागेतील झाडे तोडण्यासाठी तब्बल दोन कोटी खर्च करण्यात आले, मात्र याचा लिलाव केवळ ३२ लाखात लावला गेला. या तफावती मागील नेमका 'अर्थ' काय काढायचा? त्यामुळे या वृक्षतोड प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.



या बैठकीस कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, संभाजी पाटील, आवजड वाहतूक सेना हर्षल पाटील तालुकाप्रमुख उत्तम पाटील, युवराज पोवार, दिलीप माने, अजित खोत, शहर प्रमुख विजय टिपुगडे, तालुका संघटक सागर भावके, उत्तम शेटके उपतालुकाप्रमुख, साताप्पा नरके,उपतालुकाप्रमुख सागर पाटील रामचंद्र पाटील, सदाशिव पाटील,युवराज पाटील, बजरंग मोरे, प्रसाद डवर, अनिल चौगुले, रामचंद्र पाटील, सदाशिव पाटील,युवराज पाटील, बजरंग मोरे, प्रसाद डवर, अनिल चौगुले, कोंडीबा टिपुकडे, पवन गुरव, शाखाप्रमुख सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.