मार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंदच
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्या पाऊस थांबल्याने हिरण्यकेशी नदीला आलेला पूर ओसरू लागला आहे. भडगाव पुलावरील पुराचे पाणी देखील रात्रीपासून ओसरू लागले आहे. पावसाची अशीच उघडीप राहिल्यास दुपारपर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. पुलावर आता अर्धा फूट पाणी आहे. कालपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
या नदीवरील ऐनापुर, निलजी, जरळी हे तीन बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागाचा संपर्क पूर्णता तुटला आहे. सध्या गजरगाव मार्गे वाहतूक सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती काळजी घेत यंत्रणा सतर्क ठेवली आहे. भडगाव पुलाच्या दोन्ही बाजूस पोलीस प्रशासनाने बॅरिकेट्स लावून बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस प्रशासन, भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, तलाठी रूपाली कांबळे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी या पुराच्या पाण्याकडे लक्ष ठेवून आहेत.
पाणी ओसरल्यानंतर रस्ता स्वच्छ करण्याची गरज
भडगाव पुलावरून पुराचे पाणी ओसरल्यानंतर रस्त्यावर साचलेला चिखल व कचरा पाण्याने स्वच्छ करण्याची गरज आहे. अन्यथा चिखलामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर मोटरसायकली घसरण्याची शक्यता करता येत नाही.