Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उत्तूरच्या 'निर्मिती'चा पुस्तकपेढी उपक्रम ठरला राज्यात आदर्श

सलग २५ वर्षे मोफत पाठयपुस्तकांचे वाटप




गडहिंग्लज (प्रतिनिधी): समाजबदलासाठी युवाशक्ती हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या उत्तूर येथील निर्मिती युवा परिवारच्यावतीने पुस्तकपेढी उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी उपक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अखंडित २५ वर्षे पुस्तकपेढीचा उपक्रम राबवणाऱ्या निर्मिती मंडळाने गेल्या आठ दिवसांपासून आजरा तालुक्यातील विविध शाळांमधील गरीब, गरजू आणि होतकरू मुलांना पाठयपुस्तकांचे तसेच शिष्यवृत्ती संचाचे मोफत वाटप केले.


पुस्तकांअभावी मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी मंडळाने २५ वर्षांपूर्वी 'पुस्तकपेढी' उपक्रम सुरू केला. शिक्षकांच्या मागणीनुसार आतापर्यंत तालुक्यातील हजारो गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण केले आहे. याही वर्षी तालुक्यातील विविध शाळांमध्ये आठवी, नववी, दहावीची पुस्तके आणि पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शक संच पुरवण्यात आले. उत्तूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मंडळाचे उपाध्यक्ष किरण आमणगी यांच्या हस्ते नुकताच येथील वसंतदादा पाटील विद्यालयात पुस्तक वितरण कार्यक्रम झाला. यावेळी सचिव चंद्रशेखर आमणगी, डॉ. प्रकाश तौकरी, उमेश पोकळे, विजय पाकले, सुरेश कांबळे, अस्मिता गुरव यांच्यासह शिक्षक, पालक,  विद्यार्थी उपस्थित होते.



 समाजाचे उत्तम पाठबळ 


मंडळाच्या आवाहनानुसार अनेक पालक पुढच्या इयत्तेत गेलेल्या आपल्या मुलांची पुस्तके मंडळाच्या पुस्तकपेढीत जमा करतात. अभ्यासक्रम बदललेला असेल तर मंडळाच्यावतीने स्वखर्चाने संच खरेदी केले जातात. जमा झालेली पुस्तके, शिष्यवृत्ती संच शिक्षकांच्या विनंतीनुसार संबंधित शाळेतील गरजू मुलांना वर्षभर वापरण्यासाठी दिले जातात. वर्षभर वापरून सुस्थितीतील पुस्तके पुन्हा मंडळाकडे जमा केली जातात. समाजाच्या पाठबळावर गेली २५ वर्षे हा उपक्रम सुरू असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष महादेव मिसाळ यांनी दिली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.