आजरा (हसन तकीलदार) : दिनांक 26 मे रोजी वनविभाग आजरा येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ३० मे रोजीच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु वक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी अचानक मिटिंगसाठी बाहेरगावी गेल्यामुळे वनपाल भरत निकम व मुजावर यांचेशी यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रदीर्घ संवाद केला. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने येत्या 30 मे रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.
या आंदोलनामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात ही मुख्य मागणी असणार आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्या असूनही वनविभाग त्यावर उपाय योजना करत नसल्याचा आरोप यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी मागील महिन्यात गव्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना अद्याप नुकसान भरपाई का मिळालेली नाही याचा जाब उपस्थित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. याशिवाय वनविभागाला बहुजन मुक्ती पार्टीने दिलेल्या दिलेल्या निवेदनावरती आपण आतापर्यंत काय कारवाई केली आणि काय मार्ग काढला याचाही जाब विचारण्यात आला.
यावेळी गव्यांच्या हल्ल्यातील जखमी अथवा मृत झाले आहेत त्यांना अजूनही नुकसान भरपाई का मिळालेली नाही? सरकारचा जी.आर. आहे की तात्काळ नुकसान भरपाई अथवा मोबदला दिला पाहिजे दोन महिने उलटून गेले तरी अजून मोबदला का दिला नाही असे विचारता कागद पत्रांमध्ये काही त्रुटी आहेत असे यावेळी उपस्थित वनअधिकाऱ्यांनी सांगितले. "ऍनिमल अटॅक "हा एक शब्द नाही म्हणून मोबदला थांबवला आहे. चूक खात्याची आणि निस्तरायचं ग्रस्तानी अशी अवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे वन तळे, गवत लागवड आणि वृक्षारोपण यासारख्या मुद्द्यासाठी 30 मे रोजी वनविभागाच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्या आंदोलनामध्ये जिल्हा उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद हे उपस्थित राहिले पाहिजे असा आग्रह बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. बहुजन मुक्ती पार्टीने हातात घेतलेला विषय हा सर्व आजरेकर तसेच कोल्हापूरकरांचा गंभीर विषय असल्याने सगळ्यांनी या आंदोलनाचा सहयोग द्यावा असे आवाहन यावेळी बहुजन ते पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. जोपर्यंत लेखी उत्तरे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल तसेच टप्प्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा डॉ. तिलकरत्ने यांनी दिला.
यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, अमित सुळेकर, दत्तराज पाटील, रोहिदास दारुडकर, इर्शाद भडगावकर, सुरेश दिवेकर, झुल्फिकार शेख, सूर्यकांत कांबळे, अंकित कांबळे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.