भाजपाच्या इंजिनिअर्स ब्युरोचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : लोकहिताच्या आणि प्रशासकीय दृष्टीने सोयीचे होण्यासाठी गडहिंग्लजला जिल्हा मुख्यालयाचा दर्जा देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या इंजिनियर्स ब्युरोचे जिल्हा अध्यक्ष इंजिनिअर चंद्रकांत सावंत यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
त्या पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील दक्षिणेकडेकडील शेवटचे टोक म्हणजे गडहिंग्लज उपविभाग. ह्या उपविभागाच्या दोन्ही बाजूने कर्नाटक आणि गोवा राज्याची सीमा लागते. गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील लोकांना शासकिय कामासाठी कोल्हापूर ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. हे अत्यंत गैरसोयीचे, खर्चिक आणि वेळेचा अपव्यय करणारे आहे.उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यानाही महिन्यातून दोन ते तीन वेळा जिल्हाधिकारी यांच्या बैठकीसाठी कोल्हापूरला जावे लागते. त्याचा प्रशासकिय कामांवर परिणाम होतो. गडहिंग्लज शहर हे ह्या उपविभागाचे केंद्र आहे. शंभर खाटाचे शासकिय उपजिल्हा रूग्णालय, प्रांताधिकारी , पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, उविभागीय कार्यालय, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये, सर्व शासकीय कार्यालये, नगरपालिका आणि मोठी बाजारपेठ आहे. महाराष्ट्र राज्या नवे 22 जिल्हे करावयाचे शासनाच्या विचाराधीन आहे. तेंव्हा लोकहिताच्या प्रशासकिय दृष्टीने सोयीचे होण्यासाठी गडहिंग्लज, चंदगड, आजरा आणि भुदरगड तालुक्यासाठी गडहिंग्लजला महाराष्ट्रातील 23 वा नवा जिल्हा म्हणून जिल्हा मुख्यालयाचा दर्जा द्यावा असे श्री. सावंत यांनी म्हटले आहे.