कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी २०१९ पासून कार्यरत आहे. प्रती हप्ता प्रती लामार्थी रु.२००० या प्रमाणे आजअखेर १९ हप्त्यांचा लाभ वितरीत करण्यात आला आहे. केंद्र शासन पी.एम. किमान योजनेचा माहे एप्रिल, २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील २० वा हप्ता माहे जून मध्ये वितरीत होणार आहे. विविध त्रुटीपूर्तता अभावी सुमारे २२ हजार २७८ लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी जिल्ह्यात दिनांक ३१ मे, २०२५ पर्यंत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबीची पूर्तता करण्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणीकरण करण्यासाठी, योजनेतील प्रलंबित ६ हजार ८२४ लाभार्थ्यांनी पीएम किसान मोबाईल ॲप वापरून चेहरा किंवा अंगठा प्रमाणीकरण (Face Recognition) पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करावे. या प्रक्रियेसाठी तुम्ही महा-ई-सेवा केंद्राची तसेच कृषी सहायकाची मदत घेऊ शकता. योजनेत नवीन नोंदणी करू इच्छिणाऱ्या ५७ शेतकऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये चालू सातबारा, पती पत्नी आधार कार्ड, वारस नोंद असलेला फेरफार (फाइल आकार २०० KB पर्यंत) पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी महा-ई-सेवा केंद्राची मदत घेऊ शकता.
बँक खात्यांमध्ये आधार सीडिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उर्वरीत १२ हजार ४४० शेतकऱ्यांनी बँक शाखेशी संपर्क साधून आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करावे. किंवा पोस्ट ऑफिस येथे डीबीटी असलेले स्वतंत्र खाते उघडावे. जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या ते पाचव्या हप्त्याच्या वेळी युआयडी डिसॅबल्ड किंवा बँक फेलर ट्रांझीक्शन झाले असेल तर बँक शाखेशी संपर्क साधून आपले अद्यावत आधार कार्ड सोबत सादर करावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत असणे आवश्यक असून २ हजार २८ शेतकऱ्यांनी आपले भूमी अभिलेख १ ते १८ कॉलम मधील माहिती अद्ययावत करावी, यासाठी तुम्ही तहसील कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासाठी 31 मे पर्यंत विशेष मोहिमेत शेतकऱ्यांनी नजिकच्या कृषि सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यापैकी कोणाकडेही संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.