कानडेवाडीमध्ये जागतिक वन दिन मोठ्या उत्साहात साजरा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सध्याच्या वाढत्या तापमानाला आपणच सर्वजण कारणीभूत आहोत. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. भविष्यात आपले आरोग्य सदृढ ठेवायचे असेल तर आतापासूनच प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्षारोपण करून वृक्ष संगोपन करणे गरजेचे असल्याचे मत गडहिंग्लजचे वनपाल एस. के.निळकंठ यानी व्यक्त केले.
राजर्षी शाहू हायस्कुल कानडेवाडी मध्ये जागतिक वन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सामाजिक वनीकरण गडहिंग्लज विभागचे वनपाल एस. के. निळकंठ बोलत होते. ते बोलताना पुढे म्हणाले , सध्याच्या वाढत्या तापमाणाला आपणच सर्वजन कारणीभूत आहोत . याचे कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होत असलेली मालकी हक्कातील प्रचंड वृक्षतोड. झाडे त्याचे खोड, फांद्या, मुळे आणि पाने तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वापरतात. त्यामुळे वृक्ष कार्बन शोषक असतात. ज्या परिसरात झाडे आहेत त्या परिसरात 12 ते 18 अंश कमी तापमान असते . जगातील ३० कोटीहून अधिक लोक जंगलात राहतात तर ग्रामीण भाग सोडून शहर राहणारे अब्जावधी लोक शुद्ध पाणी, स्वच्छ हवा, कमी तापमान यासाठी पर्यावरणावरच अवलंबून असतात. वृक्ष अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांने एक तरी दरवर्षी झाड लावून त्याचे संरक्षण व संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
जागतिक वन दिनाचे औचीत्य साधुन सा. वनीकरण विभागातर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक वनिकरणाचे कर्मचारी , एस वाय यमगेकर , ए एम नाईक , टी एम पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सौ. माटले आर एन यानी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आर. व्ही. जांबोटकर यांनी सूत्रसंचालन तर जे डी रणनवरे यानी आभार मानले.