यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजरा तालुक्यातील सुळे येथील श्री महालक्ष्मी व भावेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. तब्बल १९ वर्षानंतर यात्रा पार पडत असल्याने गावात गर्दी आहे.
मंगळवार सांयकाळी देसाई यांच्या वाड्याजवळून तयार केलेला रथ पारंपरिक वाद्यांच्या गजरात सुतारांच्या घरी आगमन झाले. त्याठिकाणी रथात श्री महालक्ष्मी देवीला स्थानापन्न करण्यात आले. गुलालाच्या उधळणीत रथोत्सव गावातील मार्गावरून फिरविण्यात आला. श्री.महालक्ष्मीची मूर्ती भावेश्वरी मंदिर परिसरात विराजमान झाली. बुधवार दि.१ मे रोजी पहाटे पाच ते सहा च्यादरम्याने देवीच्या सात मानकऱ्यांना धान्याच्या घडयासह सवाद्य वाजत गाजत त्यांच्या घरातून भावेश्वरी मंदिर परिसरात आणण्यात आले. तेथे मांड पूजा करण्यात आली. यावेळी शंभूसिंह देसाई (सरकार) यांच्या हस्ते बकऱ्याचा मान देण्यात आला. त्यानंतर गावातील इतरांनाही मान दिला. सुवासिनी महिलांच्या हस्ते लक्ष्मीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सुळे, यात्रा कमिटी, श्री.शंभूसिंह विजयसिंह देसाई (सरकार) व सुळेकर ग्रामस्थ मंडळ, मुंबई, भावेश्वरी दूध संस्था, जय किसान दूध संस्था, महात्मा फुले विकास सेवा सोसायटी, व्ही. के. चव्हाण सहकारी पतसंस्था, वनराई पाणी वापर संस्था, साई को - ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मुंबई व नवजीवन को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मुंबई,आजी माजी सैनिक संघटना, पोलिस पाटील यांच्यासह स्थानिक मंडळे, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. यात्रा काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, वाहतूक कोंडीचा निर्माण होऊ नये यासाठी परिश्रम घेतले.
आप्पी पाटील, सुधीर देसाई, अंजनाताई रेडेकर यांच्याकडून पाण्याची सोय
यात्रा कालावधीत गावात लोकांची संख्या वाढल्याने व यात्रेच्या अगोदर विद्युत पुरवठा अनियमित असल्याने गावाला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली.याची दखल घेत अप्पी पाटील युवा मंच मार्फत गेली आठ दिवस दररोज दहा टँकर पाणी, सुधीर देसाई त्यांच्याकडून यात्रा कालावधीत दोन टँकर, व अंजनाताई रेडेकर यांच्याकडून एक टँकरची व्यवस्था करण्यात आली होती.