Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान ; २३ हजार ३६ मतदान केंद्र

सुमारे 2 कोटी 9 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज


उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा


दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सरासरी 62.71 टक्के मतदान 


मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क मतदारांनी आर्वजून बजावावा


मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन 


            



मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होत असून त्यासाठी यंत्रणा सज्ज असून उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसे पिण्याचे पाणी, ओआरएस पॅकेट तसेच मतदारांच्या संख्येनुसार पुरेशा प्रमाणात मंडप व्यवस्था, प्रतिक्षा कक्षाची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली.


            


मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.


            


यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, दुस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दि.26 एप्रिल  रोजी मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्पात एकूण सरासरी 62.71 टक्के मतदान झाले.


            


तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील 02, पुणे विभागातील 07 व औेरंगाबाद विभागातील 02 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे  रोजी मतदान घेण्यात येणार आहे.  यासाठी एकूण २३ हजार ०३६  मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी ०९ लाख ९२ हजार ६१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४६,४९१ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,०३६ आणि २३,०३६ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून तिसऱ्या टप्प्यात एकूण २५८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


       

तिसऱ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघासाठी मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.  मात्र मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची  मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरु राहील. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली असून घरोघरी वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन दिल्या असून इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देवून जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करत आपला मतदानाचा महत्वपूर्ण हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.



ज्येष्ठ आणि दिव्यांगांसाठी सुविधा


            

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.



मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज


            

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही  रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.



मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी


            

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत



प्रतिबंधात्मक कारवाई


            

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 1 मे पर्यंत 50,397 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 1,110 शस्रे जप्त करण्यात आलेली  आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,595  इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,11,878 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.    राज्यामध्ये दि. 1 मार्च ते  २ मे  2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 49.95  कोटी रोख रक्कम तर 36.80 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 129.89 कोटी रुपये, ड्रग्ज 220.65 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत ९२.९२ कोटी रुपये अशा एकूण ५३०.६९ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



३३,४६१ तक्रारी निकाली


               

16 मार्च ते 2 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ४३४२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ४३३३ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ३४,१६८ तक्रारीपैकी ३३,४६१ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.



जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे २०५ प्रमाणपत्र वितरित


               

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने २०५ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.


दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात दिनांक २६ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या मतदानाची टक्केवारी


तिसऱ्या टप्प्यात एकूण 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे












Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.