आजरा (हसन तकीलदार ): आजऱ्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ आणि हैदोस दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परवा एका पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा जणांचा चावा घेतला. काही तरुणांनी पुढाकार घेत "त्या "कुत्र्याला सीड फार्मजवळ घेरून यमसदनी पाठवले. परंतु प्रश्न फक्त या एका कुत्र्याचा नाही तर प्रश्न आहे तो झुंडीच्या झुंडी रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा. या अगोदर काही पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निवेदने देऊन आंदोलने केली होती. परंतु एक दोन दिवस कुत्री पकडण्याचा फार्स करून प्रकरण शांत केले गेले. आज प्रत्येक गल्लो गल्लीत, रस्त्यावर कुत्र्यांचा हैदोस दिसून येत आहे.
बाजारपेठ, शिवाजी नगर, नाईक गल्ली, कुंभार गल्ली, भारत नगर, शेख कॉलनी आंबोली रोड, गोठण गल्ली, रामदेव गल्ली इ. सर्वत्र भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. घरात घुसणे, अंगावर धावून येणे, शेतात चरणाऱ्या गुरा -शेळ्यावर हल्ला करणे असे प्रकार वाढलेले दिसून येत आहे. परवा पिसाळलेल्या कुत्र्याने पंधरा जणांचा चावा घेतला आणि राईस मिलजवळ एका लहान मुलांवर कुत्र्यांची झुंड चाल करून आली. प्रसंगावधान साधत तेथील एका रिक्षाचालक युवकाने त्या कुत्र्यांच्या झुंडीला हाकलून लावले. आता शाळांही सुरु होत आहेत. लहान मुले अंगणवाडी तसेच शाळेत जाताना कुत्री अंगावर धावून येण्याचे प्रकार घडणार आहेत. या अगोदरही असेच प्रकार घडले होते. तेव्हा समीर खेडेकर, नजीर लमतुरे, मुस्तकीम तकीलदार, फिरोज मुल्ला, इम्तियाज इंचनाळकर, महंमदरसूल तगारे यांनी एकत्र येऊन नगरपंचायतीला निवेदन दिले होते. तर शिवसेना (उबाठा )ने उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील आणि तालुकाध्यक्ष युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली चक्क कुत्रा घेऊन नगरपंचायतीवर मोर्चा काढला होता. त्यावेळी कुत्री पकडण्यासाठी माणसे पाचारण करून दहा ते पंधरा कुत्री पकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला.
यासाठी नगरपंचायतीने जुजबी प्रयत्न करून चालणार नाही. मागील वर्षी भटक्या कुत्र्यांना पकडून दूर सोडण्यात आले परंतु ती सर्व कुत्री परत भागात आली. चार पाच दिवसापूर्वी मसोली तिट्याजवळ गाडीभरून कोणी अज्ञातांनी कुत्री आणून सोडल्याचे बोलले जात आहे. साधारण असाच प्रकार सुरु आहे. या भागातून त्या भागात आणि त्या भागातून या भागात कुत्री धरून सोडणे बंद करून भटक्या कुत्र्यांची नसबंदी किंवा इतर शासकीय धोरणानुसार योजना राबवून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे काही जाणकारांचे मत आहे.


