आजरा (हसन तकीलदार ) : आजरा -कासारकांडगाव रस्ता व गटारीचे काम गेल्या वर्षी करण्यात आले. परंतु या ठिकाणच्या गटारीचे काम व्यवस्थित झाले नसल्याची तक्रार येथील राहिवाशी करीत आहेत. गटारीचे पाणी योग्य ठिकाणी निचरा होत नसल्यामुळे पटेल कॉलनीतील रेश्मा पटेल यांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रापंचिक व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. घरात झोपण्यासाठी आणि बसण्यासाठी जागा उरलेली नाही. गेल्या वर्षापासून त्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे.
आजरा -कासारकांडगाव रस्ता करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी बांधून घेणे गरजेचे होते, परंतु गटारींचे काम करताना ते गेल्या वर्षापासून अर्धवट सोडले असल्याचे बोलले जात आहे. ठेकेदार व बांधकाम विभागाला याबाबत सूचना दिल्या आहेत परंतु ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवासी करीत आहेत. मागील वर्षीही श्रीमती रेश्मा पटेल यांच्या घरात रस्त्यावरील पाणी शिरल्यामुळे सर्व प्रापंचिक वस्तूंचे नुकसान झाले होते. या महिलेचे दोन्हीही मुले शिक्षण घेत. त्यांच्यावरच हे कुटुंब अवलंबून असल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. मागील वर्षीही शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी वीज पंप आणून रात्री उशिरापर्यंत पाणी उपसले होते. त्यावेळी सुद्धा नगरपंचायतीला याबाबत सूचना दिल्या होत्या. तहसील व नगरपंचायतिच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती त्यावर उपाययोजना आजअखेर झालेल्या नाहीत.
यावर्षी पावसाच्या सुरवातीलाच घरात पाणी घुसले आहे. मुरुडेच्या टेकापासून डोंगरातून येणारे पावसाचे पाणी गटारीतून समोरच्या रस्त्यापर्यंत नेणे आवश्यक असतानासुद्धा गटार अर्ध्यातच सोडल्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून श्रीमती पटेल यांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे पटेल यांच्या प्रापंचिक व जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. ठेकेदाराकडून गटारीचे काम पूर्ण का करून घेतली नाही? काम पूर्ण झाले नसेल तर त्याचे बिल आदा का केले? त्या ठेकेदारावर कारवाई झाली का? या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? आणि या महिलेस प्रशासन न्याय देणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांतून होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारिंचे काम करून आवश्यक त्या ठिकाणी सिमेंट पाईप घालून पाण्याचा योग्य निचरा करण्याची मागणी होताना दिसत आहे.