कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2024-25 वर्षाकरीता देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विरशैव लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी सन 2024-25 वर्षासाठीचे अर्ज दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण समितीच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर यांनी केले आहे.
विरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक, प्रबोधन व साहित्यिरक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यििक सरसाऊन पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार शासन स्तरावरुन देण्यात येणार आहेत.
समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे-
या योजनेनुसार विरशैव लिंगायत समाजाकरीता समाजकल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक अध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणाऱ्या नामवंत समाजसेवक, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकक असावेत.
वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्षे कार्य केलेले असावे.
पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्याचे वय पुरुषांचे वय 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे व स्त्रियांचे वय 40 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
अपवादात्मक प्रकरणी वरील वय शिथिल करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्त केलेल्या समितीकडे राहतील, कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.
पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तिगत, मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही. पुरस्कार मिळण्यास आमदार, खासदार, जिल्हा परिषद सभासद किंवा कोणताही लोकप्रतिनिधी पात्र असणार नाही. वरील क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे वैयक्तिक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणा-या व्यक्ती पुरस्कारास पात्र असतील.
सामाजिक संस्थांसाठी पात्रता-
समाजकल्याण क्षेत्रात वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मलून करणे, अंधश्रध्दा, रुढी निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल.
संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट 1960 खाली नोंदणीकृत असावी.
स्वयंसेवी संस्थेचे वरील क्रमाक 1 मध्ये दर्शविलेले समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य 10 वर्षाहून अधिक असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थांच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्याचे अधिकार शासन नियुक्त समितीस राहतील.
स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी, तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातीत व राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावे.
विरशैव लिंगायत समाजसेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थाना दिला जाईल.
अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, विचारे माळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती नेर्लीकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

